मुंबई : राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून, न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे, तसेच राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा देखील सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे.
दरम्यान, यावरून आता राज्यात राजकीय वातावरण तापले असून, राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे सुरू केले आहे. न्यायालयाच्या या निकालाच्या पार्श्वभूमीवर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील आपले मत व्यक्त करत, न्यायालयाच्या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे.
“सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं गरीब मराठा समाजावर अन्याय झाला आहे. संपूर्ण मराठा समाज श्रीमंत नाही,” अशी प्रतिक्रिया आरक्षण रद्द होण्याच्या पार्श्वभूमीवर वंचितचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील, मराठा आरक्षणाबाबतचा तातडीचा निर्णय पंतप्रधान व राष्ट्रपतींनीच घ्यावा ही आमची त्यांना हात जोडून विनंती आहे, असं म्हणत, ज्याप्रकारे शहाबानो प्रकरण, ॲट्रोसिटी कायद्यासंदर्भात तसेच ३७० कलम काढण्यासंदर्भात, केंद्राने तत्पर निर्णय घेवून केंद्राने घटनेत बदल करण्याची न्यायप्रियता दाखवली, तशीच गती त्यांनी मराठा आरक्षणाबाबतही दाखवावी, अशी मागणी केली आहे.