मुंबई: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांना स्वबळाची भाषा आवरायला सांगा. हे सरकार पाच वर्षे चालवायचे आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी पक्षाचे प्रभारी एच.के. पाटील यांच्याकडे दोन्ही नेत्यांसमोर तक्रारी केल्या. अखेर पाटील यांना स्वबळाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे बोलायला मंत्र्यांनी भाग पाडले.
पटोले यांनी आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे केलेले विधानही अनेक ज्येष्ठ नेत्यांना आवडलेले नाही. त्यामुळे या घडामोडीच्या पाठीशी तेही एक कारण असल्याचे वृत्त आहे. ज्या मतदारसंघात शिवसेनेचे आमदार, काँग्रेसचा पराभव करून निवडून आले, तेथे काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. त्यातूनच स्वबळाची भाषा सुरू झाली. काँग्रेसने नसीम खान आणि सुरेश शेट्टी यांना कार्यकारिणीवर घेतले. या दोघांचाही पराभव त्यांच्या मतदारसंघात शिवसेना उमेदवारांनी केला. त्यामुळे सातत्याने नसीम खानही स्वबळाची भाषा करत आहेत.
नांदेड उत्तर मतदारसंघात बालाजी कल्याणकर यांनी डी.पी. सावंत यांचा, ओवळा माजीवाडा मतदारसंघात प्रताप सरनाईक यांनी विक्रांत चव्हाण यांचा, तर चेंबूरमध्ये प्रकाश फातर्फेकर यांनी चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव केला आहे. हीच परिस्थिती महाराष्ट्रात काही मतदारसंघांत आहे. त्यातच काँग्रेसने स्वतःचे आमदार असलेल्या मतदारसंघातील भाजप उमेदवारांना काँग्रेसमध्ये घेणे सुरू केले. त्यामुळे काँग्रेसची नेमकी भूमिका काय? केवळ स्वबळाची भाषा वापरून सत्ता मिळेल का? असे प्रश्न नेत्यांनी प्रभारींसमोर ठेवले.
महाराष्ट्रात काँग्रेस चौथ्या स्थानावर असूनही सत्तेत आहे. अशावेळी सत्ता टिकवायची सोडून स्वबळाची भाषा करणे पक्षाचा आत्मघात करून घेणे आहे. उद्या शिवसेना भाजपसोबत गेली व त्यांचे सरकार आले, तर काँग्रेसचे उरलेसुरले आमदारही पुढच्या वेळी निवडून येणार नाहीत. याची जाणीव न ठेवता अशी विधाने करण्याने पक्षाचे नुकसान होईल, असेही काही ज्येष्ठ मंत्र्यांनी प्रभारी पाटील यांना सांगितले.