नागरिक निर्देशांचे पालन करत नाहीत ही खेदाची बाब असून गर्दी टाळणे, मास्क व सुरक्षित अंतर आदी नियमांचा भंग करणाऱ्यांवर सुद्धा कडक कारवाई करावी, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. काटोल उपविभागीय कार्यालयात, आयोजित कोरोना व कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “सुरुवातीच्या काळात शहरी भागात असलेला कोरोना आता ग्रामीण भागात पसरला असून नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे देशमुख म्हणाले. ‘अनलॉक’ म्हणजे मुक्त संचार नसून त्याची व्यवहारासोबत सांगड घालून दिनचर्या ठरविणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. काटोल व नरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अँटीजेन टेस्ट करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. कोरोनाचा संक्रमण रोखण्यासाठी जास्तीत-जास्त आरोग्य तपासण्या करण्यात याव्यात, तसेच बाजारपेठेत मास्क व सुरक्षित अंतर नियमांचे पालन सक्तीचे करावे”.
लोकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे मुंबईत कोरोना आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश प्राप्त होत आहे. गर्दीच्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक होण्याचा धोका संभवतो. अशा वेळी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. लॉकडाऊनच्या काळातही नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केले. आता अनलॉक प्रक्रिया सुरु झाली असून आता कोरोना ग्रामीण भागापर्यंत आला आहे. आता अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असून लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन कोरोना संक्रमण थोपविण्यासाठी काम करण्याचा मानस गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.