मुंबई : राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून करोना बाधित रुग्णांचा उद्रेक होताना पाहायला मिळत आहे. गेले सलग तीन दिवस राज्यातील करोना बाधितांची रुग्णसंख्या ५० ते ५५ हजारांवर जात आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या करोना लसींचा तुटवडा, बेड्स, ऑक्सिजन, इंजेक्शन, रुग्णवाहिका यांची कमतरता, त्यामुळे आरोग्य सोयी-सुविधांचा उडालेला गोंधळ, त्यातून निर्माण झालेली भयंकर परिस्थिती अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
या बैठकीला बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असे मोठे नेते उपस्थित असून, यामध्ये मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांना उद्देशून, ‘देवेंद्रजी तुम्ही काल नव्हता, नाहीतर कालच निर्णय झाला असता, यामुळे आज बैठक बोलावल्याचे म्हटले आहे.
या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोखठोक भूमिका घेत, सध्या कोरोनाची साखळी तोडणं गरजेचं आहे आणि लॉकडाऊनशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. कडक लॉकडाऊनची गरज आहे नाहीतर परिस्थिती गंभीर होईल, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे.
तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी राज्यात संपूर्ण लॉक डाऊन करण्याला विरोध दर्शवला आहे. राज्यातील सर्व स्तरांतील आणि घटकांतील नागरिकांचा विचार करून निर्णय, निर्णय घेण्यात यावा असं त्यांनी यावेळी म्हटले आहे. तसेच राज्याने नागरिकांना मदत केली पाहिजे असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.