नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा करोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात २४ तासांत करोनाचे २,५९,१७० नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर १,७६१ लोकांचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे देशातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या १,५३,२१,०८९ पोहोचली. करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १,८०,५३० वर पोहोचला आहे. देशातील करोनाग्रस्तांपैकी २०,३१,९७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर १,३१,०८,५८२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
दुसरीकडे देशभरात रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स अपुरे पडत असताना करोना लसींचा देखील तुडवडा जाणवत आहे. देशातील अनेक भागांत कडक लॉकडाऊन पुन्हा लावण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी समाज माध्यमांवर आता जोर धरू लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर २ लाख युझर्सनी #ResignModi या हॅशटॅगचा वापर करत पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी लावून धरली. तर, काही युझर्सनी पंतप्रधान मोदींची तुलना ‘निरो’शी केली. दरम्यान, यामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डीएमके आणि डाव्या पक्षांच्या अधिकृत ट्विटर हँडलचाही समावेश असल्याचे पाहायला मिळाले.
संपूर्ण भारत करोनाशी दोन हात करत असताना, भाजप आणि नेते मंडळी मात्र प.बंगालमधील विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी लढत आहे, असा आरोप देखील यावेळी अनेकांनी केला आहे. याशिवाय विविध प्रकारचे फोटो, कार्टून, व्हिडिओ, मिम्स ट्विटर वापरकर्त्यांनी या हॅशटॅगचा वापर करून शेअर केले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात देखील परिस्थिती बिकट असून, उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात १५ दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता असल्याचे संकेत आवाज पार पडलेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना अनेक मंत्र्यांनी दिले आहेत.