भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच खासदारकीची शपथ घेतली. इंग्रजीतून घेतलेल्या शपथेनंतर घोषणा दिल्याने उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना उदयनराजे यांना समज द्यावी लागली. या मुद्ययावरून भाजपवर टिका केली जात आहे. तसेच अपमान झाल्याबद्दल छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी केली जात आहे.
मात्र यावर आता खुद्द उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट मत व्यक्त केले आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भरपूर राजकारण झालं. महाराजांचा अपमान झाला असता, तर गप्प बसणारा मी नाही, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता, पण तसं काही झालंच नाही व्यंकय्या नायडू यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही” अशा शब्दात भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आपले मत सांगितले आहे.
सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला तो, फक्त जे राज्यघटनेत नाही त्याला घेतला, माझी हात जोडून राजकारण करणाऱ्यांना विनंती, आतापर्यंत अनेक गोष्टींवरुन राजकारण झालं, महाराजांचा अवमान झाला असता, तर मी गप्प बसलो नसतो, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता, असं उदयनराजे भोसले म्हणाले.
“माझा स्वभाव पाहता मी ऐकून घेईन असं वाटतं का तुम्हाला? या सभागृहाचा चेअरमन मी आहे, असं फक्त ते (नायडू) म्हणाले. आक्षेप काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला, व्यंकय्या नायडूंनी उलट त्यांना थांबवलं, पवारसाहेब तिथेच बसले होते, आपण त्यांना विचारा, जे घडलं नाही, ते भासवण्याचा प्रयत्न करू नका, ही हात जोडून कळकळीची विनंती” असे उदयनराजे म्हणाले.