आमचं तर हे तीन पक्षांचं सरकार आहे. केंद्रात किती पक्षांचं सरकार आहे. गेल्या वेळी एनडीए मीटिंगला गेलो होतो तेव्हा तर 30-35 चाकं होती. म्हणजे रेल्वेगाडी होती, असे म्हणत त्यांनी भाजपला अप्रत्यक्ष टोला लगाविला.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर रोखठोक भूमिका मांडली. ठाकरे म्हणाले, रिक्षा हे गरिबांचं वाहन आहे. बुलेट ट्रेन की रिक्षा यात निवडायचं झालं तर मी रिक्षाच निवडेन. मी गरीबांच्या मागे उभा राहीन. कोणी असा समज करुन घेऊ नये की, आता मी मुख्यमंत्री झालो म्हणजे बुलेट ट्रेनच्या मागे उभा राहीन.
माझं मत मी लोकांसोबत असल्याने बुलेट ट्रेन नको हे आहेच. पण आतासुद्धा सगळ्यांच्या मताने बुलेट ट्रेन नको असेल तर मी नाही करणार. म्हणून तीन चाकं तर तीन चाकं, ती चालताहेत ना एका दिशेने. मग तुमच्या पोटात का दुखतंय!, असा सवाल त्यांनी केला.
सरकारमध्ये शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी प्रमुख पक्ष आहेत. यापैकी कॉंग्रेसचा एक प्रेमळ आक्षेप सुरुवातीला होता, पण तो गैरसमज मी मध्ये भेटल्यानंतर दूर झालेला आहे. आता आघाडीत कोणतीही कुरबुरी नाही. एक गोष्ट स्वीकारली पाहिजे आणि ती मी नक्कीच स्वीकारतो की, गेल्या दोन-तीन महिन्यांत फेस टू फेस गाठीभेटी अवघड झाल्या आहेत. त्यामुळे फोनवरुन किंवा व्हिडीओच्या माध्यमातून गाठीभेटी थोड्याफार सुरु असतात, असे ठाकरे यांनी सांगितले