ग्लासगो: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच स्कॉटलँडचा दौरा केला आणि याचं निमित्त होतं COP२६ कॉन्फरन्स. याठिकाणी मोदींनी भाषणही केलं. त्याच ठिकाणी शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी भेटलेला पुरस्कार स्वीकारला. पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेकडून दाखल घेण्यात आली असून महाराष्ट्राला इन्स्पायरिंग रिजनल लीडरशिप म्हणजेच प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व साठी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्राला अंडर २ कोईलेशन फॉर क्लायमेट ऍक्शनकडून हा पुरस्कार मिळाला आहे. स्कॉटलंडमध्ये अंडर-२ कोईलेशन फॉर क्लायमेट ऍक्शनतर्फे तीनपैकी एक पुरस्कार जिंकणारे महाराष्ट्र हे भारतामधील एकमेव राज्य आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा पुरस्कार महाराष्ट्राच्या वतीने स्वीकारला आहे. महाराष्ट्राच्या हवामान भागीदारी आणि क्रिएटिव्ह क्लायमेट सोल्युशनची देखील या पुरस्करसोहळ्यात विशेष दखल घेण्यात आली आहे.
शाश्वत भविष्यासाठी जगभरात क्लायमेट ग्रुप स्थानिक शासकीय संस्थांसह कार्यरत आहेत आणि त्यांच्यासह विविध उपाययोजनांवर आम्ही काम करणार आहोत. महाराष्ट्राच्या या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळाल्याचे समाधान असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला व देशाच्या पर्यावरण संवर्धन ध्येयास समर्पित करतो असं देखील ठाकरे म्हटले आहेत.
हवामान बदलाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र प्रत्येक गोष्टींमध्ये पुढाकार घेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वन्यजीव प्रेमी आणि संवर्धनवादी दृष्टीकोन असणारे नेते आहेत. त्यांनी आम्हाला चांगल्या आणि हरित भविष्याची स्वप्ने पाहण्याची संधी दिली आहे. पर्यावरण जपण्यासाठी आम्ही माझी वसुंधरा म्हणजेच ‘माय प्लॅनेट’ ही चळवळ सुरू केली आहे, अशी माहिती देखील पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी दिली.
एवढंच नाही तर आम्ही पंचमहाभूतांवरही लक्ष केंद्रित करत आहोत. महाराष्ट्र राज्य सरकार पारंपरिक ऊर्जेऐवजी स्वच्छ ऊर्जेचा विचार करीत आहे. नुकतेच एका महामार्गाचे सोलराइजेशन केले असून २५० मेगावॅट ऊर्जा निर्माण करणार असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.
भूगोल, वंशाच्या सीमा, राष्ट्रीयत्व किंवा लिंगभेद नसलेल्या या जागतिक समस्येवर काम करण्यासाठी सामूहिक प्रयत्न आणि विधायक व अर्थपूर्ण कृती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. हवामान कृतीसाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न व योगदानाबद्दल अंडर -2 कोईलेशनद्वारे मान्यता मिळाली याचा आम्हाला खरोखरच आनंद होत आहे, असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.