मुंबई : राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून, न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे, तसेच राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा देखील सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे.
दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षण निकालाविषयी राज्यातील जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्र्यांचा हा संवाद सायंकाळी 8.30 वाजता होणार असून, राज्यातील जनतेशी ते समाज माध्यमांद्वारे संवाद साधतील. यावेळी ते या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला शांतता राखण्याचं आवाहन करु शकतात. तसेच महामारी संदर्भात देखील उपयुक्त माहिती देण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज रात्री ८.३० वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधतील.
CM Uddhav Balasaheb Thackeray will address the state at 8:30pm tonight (5th May 2021)
Link: https://t.co/2xokOekMo2
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 5, 2021
आज मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठक देखील बोलावली होती. यामध्ये देखील काही महत्वाचे निर्णय घेतले गेले असून, राज्यातील महत्वाच्या विषयनावर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. याच दरम्यान न्यायालयाचा निर्णय सुनावला गेल्याने, याविषयी ते संवाद साधणार असल्याची जास्त चर्चा आहे. सोबतच महाविकास आघाडी सरकारनं मराठा आरक्षणाच्या प्रश्नी सुप्रीम कोर्टात दिलेला लढा, याविषयी माहिती देण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यालयाच्या निर्णयावरून राज्यात राजकीय वातावरण तापले असून, राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे सुरू केले आहे. न्यायालयाच्या या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील एक निवेदन प्रसिद्ध केले होते. यात त्यांनी राज्यातील शेतकरी, कष्टकरी व लढवय्या समाजाचे हे दुर्देवच म्हणायला हवे”, असे मत मांडले होते.
तसेच, यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीराजे हे गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधानांची वेळ मागत आहेत, त्यांना पंतप्रधानांनी का वेळ दिली नाही? असा सवाल देखील त्यांनी विचारला होता. यावेळी मराठा आरक्षणाबाबत देखील केंद्राने सरकारच्या इतर धोरणांसारखीच तत्परता दाखवावी, अशी विनंती देखील त्यांनी केंद्र सरकारला केली होती.