मुंबई : राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून, न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे, तसेच राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा देखील सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे.
दरम्यान, यावरून आता राज्यात राजकीय वातावरण तापले असून, राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे सुरू केले आहे. न्यायालयाच्या या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील एक निवेदन प्रसिद्ध केले असून, राज्यातील शेतकरी, कष्टकरी व लढवय्या समाजाचे हे दुर्देवच म्हणायला हवे”, असे मत त्यांनी मांडले आहे.
तसेच, यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीराजे हे गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधानांची वेळ मागत आहेत, त्यांना पंतप्रधानांनी का वेळ दिली नाही? असा सवाल देखील विचारला आहे. मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पंतप्रधानांना आहे म्हणून हा प्रश्न, अशी छोटी टिपण्णी त्यांनी यावेळी केली आहे.
यावेळी आपल्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांनी, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करता येणार नाही, पण यानिमित्ताने कुणी महाराष्ट्राचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करु नये. तसेच जनतेने उगाच डोकी भडकवून घेवू नये. मराठा आरक्षणाबाबत कायद्याची लढाई विजय मिळेपर्यंत सुरुच राहील!, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली आहे.