मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ५ मे रोजी मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर, मराठा समाजात मोठ्या प्रमाणावर नाराजी आणि संतापाची लाट निर्माण झाली आहे. या मुद्द्यावरून ठाकरे सरकार आता चांगलेच अडचणीत सापडले असून, छत्रपती संभाजीराजे यांनी देखील ठाकरे सरकारसमोर मांडलेल्या ५ मागण्यांसाठी, सरकारला ६ जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.
तसेच, विरोधकांनी देखील यावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले असून, यातच आज भाजपचे नेते नारायण राणे यांनीही ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन, आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेतले आहे. ‘ठाकरे सरकारच्या बेफिकीर वृत्त्तीमुळंच मराठा आरक्षण गेल्याचं सांगत त्यांनी, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फडणवीस सरकारने दिल्या होत्या तश्या, मराठा समाजाला शैक्षणिक व आर्थिक सवलती द्याव्यात. यासाठी ३ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे. तसेच, आरक्षण रद्द होण्यापूर्वी ज्या उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती, त्यांना तातडीने सरकारी नोकरीत सामावून घ्यावे,’ अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच, आरक्षणाची बाजू न्यायालयात मांडण्यात, आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरले असून, ज्या मुद्द्यांवर आरक्षण रद्द झाले होते, त्याच मुदद्यांवर भाजपने उच्च न्यायालयात हे आरक्षण टिकवले होते. परंतु, या सरकारने बेफिकीरी दाखवली, सरकारच्या वकिलांमध्ये काहीच समन्वय नव्हता, ते वेळेत न्यायालयात आले नाहीत, ठाकरे सरकारने खटला पुढे नेण्यात टाळाटाळ केली, गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या परिशिष्टाचे इंग्रजीत भाषांतर करून दिले नाही, या सर्वांमुळे आयोग एकतर्फी असल्याचा गैरसमज निर्माण झाला. उद्धव ठाकरेंना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाहीये, मी त्यांना चांगलं ओळखतो,’ असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
‘आता हे आरक्षण रद्द झाले आहे, तरीही सरकारची बेफिकिरी वृत्ती कमी होत नाहीये, नाहीतर आत्तापर्यँत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली असती. मात्र, दुसरीकडे केंद्राने मात्र १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर राज्यांचा अधिकार अबाधित आहे, हे स्पष्ट करण्यासाठी फेरविचार याचिका दाखल केली आहे. आताही मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारलाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. फक्त पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना निवेदन देऊन दिशाभूल करण्याचा आणि जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न ठाकरे सरकार करत आहे,’ अशी टीका देखील त्यांनी केली आहे.
Read Also :
- ओबीसीला आरक्षण द्या, अन्यथा निवडणुका होऊ देणार नाही; पंकजा मुंडेचा इशारा
- राज्य सरकार अतिशय दुर्बल आणि बनावटी कारणं देतं आहे
- ‘ठाकरे सरकारची माझ्यावर पाळत, हेरगिरी सुरु’ – छत्रपती संभाजीराजे
- सात वर्षे निव्वळ स्वप्ने दाखवली, पण एकही पूर्ण केलं नाही
- मुख्यमंत्र्यांची तंबी! गर्दी कराल तर याद राखा, कडक निर्बंध लावले जातील