मुंबई : देशात महामारीने बाधित होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. परिणामी देशाच्या आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असून बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, रेमेडीसीवर इंजेक्शन्स आणि इतर औषधे, तसेच लसींचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे रुग्णांचे हाल होत असून, अनेकांचा अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच वाढत्या महामारीच्या संक्रमणामुळे मृत्यूदरातही वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर आज माध्यामांशी आणि पत्रकारांशी बोलताना, शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी, परदेशी प्रसार माध्यमं आणि समाज माध्यमं, ज्या प्रकारे जगभरात भारताचं चित्रं निर्माण करत आहेत. त्यामुळे भारताचं सामाजिक स्वास्थ आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. परदेशी माध्यमांचं हे भारताला बदनाम करण्याचं आणि भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचं षडयंत्र असू शकतं, असं वक्तव्य केलं आहे.
तसेच, परदेशी माध्यमांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान होत असेल, तर सर्वांनी मतभेद विसरून आणि राजकारण न करता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.