पंढरपूर : राज्यातल्या प्रमुख प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी, पंढरपुरात आपल्या प्रचारसभांनी निवडणुकीच्या मैदानात धुरळा उडवून दिला असून, पंढरपूर पोट निवडणूक सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेची केली आहे. या दोघांकडूनही आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, अनेक दाव्यांचा देखील पाऊस पडत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, ‘सरकार बदलायचं माझ्यावर सोडा’, असे विधान प्रचारसभेत केले होते. त्यांच्या या विधानाचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी, नाव न घेता खरपूस समाचार घेतला आहे.
‘सरकार बदलणं तुम्हाला कर्नाटक, मध्य प्रदेशात शक्य झालं म्हणजे महाराष्ट्रात शक्य होईल, असं नाही. महाविकास आघाडीला १७० पेक्षा जास्त आमदारांचे पाठबळ आहे. मात्र, भाजपचे नेते पंढरपुरात येऊन ‘तुम्ही इथला आमदार निवडून द्या, राज्यातलं सरकार पाडून दाखवतो’, अशी वक्तव्ये करत आहेत. असे म्हणत त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणे म्हणजे काय खेळ वाटतो काय? हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे, हे कोणा येरा गबाळ्याचे काम नाही, असा थेट इशारा दिला आहे.
तसेच त्यांनी, स्वतःचे आमदार फुटतील या भीतीतून भाजपकडून वारंवार सरकार बदलाच्या वल्गना केल्या जात असल्याचा पलटवार देखील विरोधी पक्षावर केला आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ सभेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय शिंदे, आमदार यशवंत माने, शिवसेनेचे संभाजी शिंदे, दीपक साळुंखे, उमेश पाटील, राजेंद्र गवई उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, ‘पोटनिवडणुकीच्या माध्यमातून अत्यंत घाणेरड्या पद्धतीने राज्यात राजकारण होत आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमचा प्रस्ताव होता, असा चुकीचा प्रचार भाजप करीत आहे. मात्र, भाजपनेच सर्वप्रथम उमेदवार जाहीर केला. त्यानंतरच महाविकास आघाडीने उमेदवार दिला, असे सांगत पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात सध्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीची जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मतदारसंघातील रिक्त जागेवर पोट निवडणूक घेण्यात येत आहे. या मतदारसंघासाठीचे विधानसभा पोटनिवडणूकीचे मतदान १७ एप्रिल रोजी पार पडणार असून, या निवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे, महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्यात थेट लढत होणार आहे.