येत्या ५ ऑगस्टला होणाऱ्या राम मंदिर भूमिपूजनाच्या सोहळ्याचे निमंत्रण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेले नाही. यावरुन शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपवर टीका करायला सुरुवात केली आहे. प्रभू रामचंद्र हे केवळ आणि केवळ भाजपचे आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपकडून होतो आहे, अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे
विनायक राऊत म्हणाले की, ‘राम मंदिर निर्मितीचा मार्ग ज्यांच्या प्रयत्नातून होत आहे, त्यांची जाणीव ठेवणे आज आवश्यक आहे. पण, दुदैवाने तसे होत नाही. कदाचित उद्धव ठाकरे रामजन्मभूमीत गेले तर राम मंदिराचे श्रेय शिवसेनेला जाईल, याची भाजपला भिती वाटत असेल. आता राम मंदिराचे भूमिपूजन पक्षाचे नाही तर राम भक्तांचे आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन भूमिपूजनाचा पर्याय सुचवला, तो योग्यच आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेकडो लोकांना एकत्र बोलवणे योग्य नाही. असे केल्याने आयसीएमआरच्या निर्णयाचे हे उल्लंघन होईल,’ असे राऊत म्हणाले.
दरम्यान , “महाविकासआघाडीचे सरकार मजबूत आहे. सरकारमधील कुरबुरी सोडवण्यास महाविकास आघाडीचे नेते सक्षम आहेत,” असेही विनायक राऊत यावेळी म्हणाले.