सांगोला: उजनी धरणाचे पाणी इंदापूर तालुक्याला देण्याबाबत राज्य सरकारने काढलेल्या आदेशामुळे सोलापूर जिल्ह्यात मोठा जनक्षोभ उसळला होता. सोलापूर जिल्ह्यातील जनतेची भावना आपण मुख्यमंत्री उद्धवर ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवली, त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा आदेश रद्द करून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय दिला आहे, असा दावा सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी केला आहे. उजनी धरणाचे पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्यासाठी सर्वेक्षणाचा आदेश राज्य सरकारने काढला होता.
राज्य सरकारने दिलेल्या आदेशाच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती. सोलापूर जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांनी विशेष एकी दाखवत या निर्णयाला मोठा विरोध केला होता. यामध्ये आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार समाधान अवताडे, आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजय मामा शिंदे यांनी मोठा विरोध केला होता. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी देखील अत्यंत आक्रमक भूमिका आणि या संदर्भातरक्तरंजित लढाईचा इशाराही दिला होता.
आमदार पाटील म्हणाले की, दुष्काळी सोलापूर जिल्ह्यासाठी उजनीजलाशय वरदान ठरले आहे. सोलापूर जिल्हा सिंचन व पिण्याचे पाणी यासाठी उजनी धरणावर अवलंबून आहे. उजनी धरणाचे पाणीवाटप हे यापूर्वी ठरले असतानाही त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न राजकीय प्रतिनिधींद्वारे केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रचंड आक्रोश माजल्याने आपण उजनीच्या पाण्याबाबत परखडपणे व्यक्त झालो. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व जनतेची व्यथा खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली. मुख्यमंत्री उद्धवतावरे यांनी जनतेच्या भावना लक्षात घेऊन उजनीच्या पाण्याबाबत काढलेला आदेश तत्काळ रद्द केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा आदेश रद्द करून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय दिला आहे.