मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ५ मे रोजी मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर, मराठा समाजात मोठ्या प्रमाणावर नाराजी आणि संतापाची लाट निर्माण झाली आहे. या संतापाच्या लाटेला शांत करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यभर दौरा सुरु केला. तसेच, त्यांनी राज्यातील अनेक महत्वाच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांना मराठा समाजाला आरक्षणाची किती नितांत गरज आहे आणि हा मुद्दा कसा महत्वाचा आहे हे सांगितले.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकार आता चांगलेच अडचणीत सापडले असून, आत्तापर्यंत या प्रश्नावरून सामंजस्याची भूमिका घेणाऱ्या छत्रपती संभाजीराजे यांनी देखील ठाकरे सरकारसमोर मांडलेल्या ५ मागण्यांसाठी, सरकारला ६ जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. या पार्श्वभूमीवर, आज मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी आम्ही संभाजीराजेंसोबत आहोत, असे स्पष्ट केले आहे.
तसेच, हे आरक्षण मिळवून देण्यासाठी संभाजीराजे वेगवेगळ्या नेत्यांना भेटत आहेत, यामध्ये आम्हाला काही गैर वाटत नाही, यासंदर्भात ते मलाही भेटले. या मुद्द्यावर सर्वच पक्षांनी एकत्र यावं, अशी त्यांची भूमिका आहे, आमचीही तीच भूमिका आहे. मात्र, त्यांना मी एवढंच सांगितलं, “आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कोणाहीसोबत बैठकीला, चर्चेला तयार आहोत. फक्त एकच सूचना, समोरच्यांनी राजकारण करु नये, एवढचं त्यांनाही सांगावं,’ असे फडणवीस यांनी सांगितलं
ठाकरे सरकारला अल्टिमेटम, या ५ मागण्यांचा ६ जून पर्यंत निकाल लावा अन्यथा…
संभाजीराजेंनी ठाकरे सरकारसमोर खालील ५ मागण्या ठेवल्या आहेत. या ५ मागण्यांचा निकाल येत्या ६ जूनपर्यंत मार्गी न लावल्यास त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी रायगडवरून मराठा समाज आंदोलनाचा एल्गार करेल, असा थेट इशारा दिला आहे.
- न्यायालयाने आदेश दिल्यानुसार मराठा समाजातल्या मुला-मुलींच्या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावा! नियुक्त्यांना आरक्षण द्या!
- ‘सारथी’ला १००० कोटींचा निधी द्या! सारथीला नुसती जागा देण्याऐवजी तिला स्वायत्तता द्या! सारथीचं प्रतिनिधित्व मराठा समाजाला करू द्या! नाहीतर सारथीतुन शाहू महाराजांचं नाव काढून टाका!
- मराठा समाजातील छोट्या व्यावसायिकांना संजीवनी ठरलेल्या ‘अण्णासाहेब महामंडळा’ला निधी वाढवून, त्याला नवंसंजीवनी द्या!
- मराठा समाजातील विध्यार्थी आणि विद्यार्थिनींचा राहण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक वसतिगृह उभारण्याचा निर्णय घ्या!
- ३०% धनिक मराठा समाज सोडून उर्वरित ७०% हा गरीब आणि वंचित मराठा समाज आहे. या उर्वरित मराठा समाजालादेखील बहुजन समाजासारखं आरक्षण द्या!
Read Also :
- मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा अन् धावली मेट्रो राणी…
- देवेंद्र फणवीस यांनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय चर्चांना उधाण
- पिंपरी चिंचवडच्या उद्योगांना ऑक्सिजन द्या; अजित पवारांचे जिल्हा प्रशासनाला आदेश
- भाजपनेच ओबीसी समाजाचा मुडदा पाडला – नाना पटोले
- धनगर आरक्षणात काका-पुतण्याचा काळाबाजार – गोपीचंद पडळकर