ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंना पोरगी बघायची असली तरी नरेंद्र मोदींना पत्र लिहितात, अशी खोचक टिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर केली होती. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला आहे. चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे, त्यांच्यावर उपचाराची गरज आहे, अशी सडकून टीका संजय राऊत यांनी केली.
तुम्हीच म्हणालात ना चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे. मग तोल ढासळलेल्यांवर बोलायचं नसतं. त्यांच्यावर उपचाराची गरज असते, अशी खोचक टीका राऊत यांनी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचाही राऊत यांनी समाचार घेतला. फडणवीस माझ्यावरच निशाणा साधतील. त्यांची टीका मी गंभीरपणे घेत नाही. ते माझे मित्र आहेत. मित्रं राहतील. त्यांचं दु:ख मी समजू शकतो. माझ्यामुळे त्यांची सत्ता गेली. ते सत्तेत येऊ शकले नाहीत. त्यामुळे ते दु:खी आहेत. पण माझ्यावर टीका करण्यात त्यांना आनंद वाटत असेल तर त्यांनी खुशाल टीका करावी. पुढील साडेतीन वर्षे टीका करून त्यांनी आनंद घ्यावा, असा टोला राऊत यांनी लगावला.
मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा घाट घातला जात असल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. विरोधी पक्षाला निवडणुकीची एवढी घाई का झाली आहे. त्यांना कुणी सांगितलं अशाप्रकारचा काही निर्णय होत आहेत? त्यांच्या हेरांनी… ज्या काही गुप्तहेरांनी त्यांना माहिती दिली असेल तर ती चुकीची आहे. निवडणुकांचं काय होणार हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि निवडणूक आयुक्तच सांगतील. ते अधिकारीक व्यक्ती आहेत. तुम्ही कशाला जनतेत संभ्रम निर्माण करत आहात, असा सवालही राऊत यांनी केला.