“राज्यातील निवडणुकीला अजून चार वर्षाचा अवधी आहे. निवडणुका होतील तेव्हा स्वतंत्रपणे लढल्या जातील. त्यानंतर राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहोत,” असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावरुन आता पाटील यांनी घुमजाव केलं आहे
माझं विधान उलट्या पद्धतीने माध्यमांनी दाखवलं असं सांगत शिवसेनाच काय इतर कुठल्याही पक्षाला आमचा कुठलाही प्रस्ताव नाही, असं ते म्हणाले.
पाटील म्हणाले, “माझं वाक्य उलटं वाचलं गेलं. मी म्हटलं होतं की, जर उद्या आमचं सरकार आलं तर सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व विधानसभा, लोकसभा आम्ही स्वबळावरच लढणार आहोत. कारण भाजपाच्या वोट बँकेवर आणि मोदींच्या चेहऱ्यावर विजयी व्हायचं नंतर काही तिसरचं करायचं हे चालणार नाही. त्यापेक्षा प्रत्येकानं आपापलं लढावं.”
“त्यामुळे महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येण्याबाबत हा विषय नव्हता तर निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबतचा विषय होता. त्यामुळे शिवसेनाच काय इतर दुसऱ्या कोणालाही आमचा सरकार स्थापन करण्याबाबतचा कुठलाही प्रस्ताव नाही,” असं यावेळी पाटील यांनी स्पष्ट केलं.