मुंबई : महाराष्ट्रात सध्या पंढरपूर पोटनिवडणूकीची जोरदार चर्चा सुरु आहे. राज्यातल्या मोठ्या पक्षाच्या नेत्यांनी पंढरपुरात आपला तळ ठोकला असून, प्रचारसभांचा धुरळा निवडणुकीच्या मैदानात उडत आहे.
आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात प्रचारसभा घेतल्या, यावेळी त्यांनी, “सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू,” अशा शब्दात ठाकरे सरकारला थेट इशारा दिला आहे. त्यांच्या या बेधडक वक्तव्याने राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आले आहे.
‘लोक विचारतात एका मतदारसंघाची निवडणूक आहे, काय फरक पडणार, त्याने सरकार बदलतंय का? अरे, सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघतो; पण या मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची आहे, जर या सरकारला जागा दाखवून द्याययची असेल, हीच पहिली संधी आहे’, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली.
दरम्यान, त्यांच्या या टिकेला उत्तर देताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी, ‘या काळात सरकार पडणार, सरकार पाडणार, सरकार अस्थिर करणार हे, जेव्हा ते पाडतील तेव्हा त्यांचं अभिनंदन करू’, असं सांगत, विरोधी पक्षाला अशी भाषणं करावीच लागतात. यापूर्वी आम्हीही अशी भाषणं केलेली आहेत, लोकांमध्ये उत्साह आणण्यासाठी, त्यांचे आमदार एकत्र ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस तसे भाषण करत असतील, अशी टीका संजय राऊत केली आहे.
तसेच, ‘सत्ता बदलाचं आम्ही त्यांच्यावरच सोडलंय; पण त्यांनी पंढरपूरात जाऊन हे विधान केल्यामुळे, प्रत्यक्ष विठोबा माऊलीसुद्धा अत्यंत सावध झाली असेल; पण विठुमाऊलीचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे’, अशा शब्दात त्यांनी फडणवीसांना डिवचलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मतदारसंघातील रिक्त जागेवर पोट निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्यात थेट लढत होणार आहे. पंढरपूर पोट निवडणूक सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेची केली आहे.