कोलकाता : पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम ही चार राज्य आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचा निकाल समोर आला आहे. अनेक राज्यांमध्ये मतदारांनी स्थानिक पक्षाला कौल दिल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्वांत पश्चिम बंगालच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष होते. बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने एकहाती सत्ता काबीज करत भाजपचा दारूण पराभव केला आहे.
दरम्यान, सत्ता मिळताच तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि प.बंगालच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहरा असलेल्या ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. देशातल्या सध्याच्या महामारीच्या परिस्थितीवरून त्त्यांनी, बंगालच्या नागरिकांना आश्वासन दिले की; संपूर्ण राज्यातल्या लोकांना मोफत लस दिली जाईल, सोबतच त्यांनी देशातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याची मागणी केली आहे. तसेच, देशातील लोकांना मोफत लस न मिळाल्यास, पुन्हा गांधी पुतळ्याच्या बाहेर आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
संपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या प. बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने, भाजपचा दारुण पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. प.बंगालमध्ये भाजपनं आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती, मात्र तिथे भाजपाला केवळ ७७ जागाच मिळाल्या, तर दुसरीकडं ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला आत्तापर्यंतच्या सर्वात जास्त २१२ जागा मिळाल्या आहेत.