नुकतंच शरद पवार यांनी राम मंदिराबाबत केलेल्या विधानावरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यावरुन भाजपने मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करुन, आता उद्धव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी पवारांच्या NOC ची गरज लागणार का असा सवाल विचारला होता. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपवर पलटवार केला.यावर शिवसेनेचे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देशाचे नेते आहेत. पवारसाहेब जे बोलले तो त्यांच्या पक्षाचा अजेंडा आहे. शिवसेनेचं हिंदुत्व जगजाहीर आहे. त्यामुळे पवारांनी राम मंदिराबाबत केलेलं वक्तव्य हे सरकार एकत्र आल्यामुळे केलंय, असं नाही. भाजपने वाटोळं केलंय. आता राम मंदिरावरुन राजकारण करु नये”, असं आवाहन शिवसेनेचे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं.
दरम्यान, प्रताप सरनाईक यांनी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र विश्वस्तांना पत्र लिहून “कोणतंही राजकारण न करता शिवसेनाप्रमुखांचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला निमंत्रित करा, असं म्हटलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी राम मंदिर लढ्यात शिवसेनना अग्रस्थानी असल्याची आठवण ट्रस्टला करुन दिली.