पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींचे पॅकेज देशासाठी जाहीर केले. परंतु, राज्यात हे पॅकेज कुठेच दिसले नाही. मग हे पॅकेज गेले कुठे ?, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विचारला आहे. नाशिक दौऱ्यावर असताना ते बोलत होते.
या दौऱ्यावर त्यांनी कोरोना उपाययोजनांचा आढवा घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात खासगी डॉक्टर्स पुढे येत नसल्याच्या तक्रारी आहेत. ते स्वत:हून पुढे येत नसतील तर त्यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा वापरण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनास देण्यात आल्या आहेत.
मुंबईतील चित्र बदलू लागले आहे. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे पवार यांनी सांगितले.