पाच ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाला जाणार का हा प्रश्न सध्या विचारला जात आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
“उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळाले का, याची चर्चा रंगली आहे. मात्र सध्या फक्त तारीख जाहीर झाली आहे. राजकीय सोशल डिस्टन्सिंग ठेऊन कार्यक्रम कसा करता येईल, यावर न्यास निर्णय घेईल” असं उत्तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं.
“उद्धव ठाकरे हे नेहमीच रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी जातात. ते जेव्हा मुख्यमंत्री नव्हते, तेव्हा गेले होते, मुख्यमंत्री झाले तेव्हा गेले. अयोध्या आणि शिवसेनेचं नातं कायम आहे ते काही राजकीय नातं नाही” असं संजय राऊत म्हणाले.
“राजकारणासाठी आम्ही अयोध्येत जात नाही. राम मंदिराचा पूर्ण रस्ता शिवसेनेने तयार केलेला आहे. मंदिरामध्ये येणारे मुख्य अडथळे होते ते शिवसेनेने दूर केले. राजकारण म्हणून नाही, तर श्रद्धा हिंदुत्व या भावनेतून शिवसैनिकांनी बलिदान दिलं. ते आमचं नातं कायम आहे” असं राऊत म्हणाले.