मुंबई : राज्यात वाढत्या करोना बाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर १५ एप्रिलपासून संचारबंदी आणि सोबतच काही कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र तरीही राज्यातील परिस्थितीमध्ये काही सुधारणा दिसत नसून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे राज्यातला लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता असल्याचे भाकीत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
१५ दिवसांच्या संचारबंदी नंतरही परिस्थितीचे गांभीर्य जनतेमध्ये दिसत नाहीये. त्यामुळे १ मे नंतर संचारबंदी आणि निर्बंध वाढवावे लागणार असून, राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याचा विचारावर मुख्यमंत्री दोन दिवसांत निर्णय घेतील, असे देखील त्यांनी सांगितले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यामुळे राज्यात १ मे नंतरही निर्बंध कायम राहणार असल्याचे संकेतच वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
यावेळी त्यांनी, आपण लॉकडाऊन केलेला नाही. अनेक व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध होता. व्यापारी किंवा जीवनाश्यक वस्तूंची, इतर लहान दुकाने असणारेही १०० टक्के लॉकडाऊन करा, अशी मागणी करत आहे. अनेक जिल्ह्यांमध्येही लोक मागणी करत असून, आम्ही मुख्यमंत्र्यांना यासंबंधी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री इतरांशी चर्चा करुन तो निर्णय घेतील, असे सांगितले आहे.
दरम्यान, काल राज्यात तब्ब्ल करोना बाधित रुग्णांच्या आकड्यामध्ये ६७ हजार १२३ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे आणि एकाच दिवसात ४१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.