पुणे : राज्यातल्या वाढत्या महामारीच्या प्रादुर्भावामुळे, राज्य सरकारने १४ एप्रिलपासून राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानंतर, सातत्याने यामध्ये आणखीन निर्बंधांची वाढ करून, २२ एप्रिलपासून जिल्ह्यांतर्गत आणि राज्याबाहेरील प्रवासावरही बंदी घालण्यात आली.
तसेच, लोकल आणि बससेवाही सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली आहे. आता १ मेपर्यंत ही नवीन नियमावली लागू राहणार आहे. परंतु, १ मे नंतरही राज्यात लॉकडाऊन वाढणार का, असा सवाल आता सामान्य नागरिकांकडून सरकारला विचारला जात आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, माध्यमांशी आणि पत्रकारांशी बोलताना याबाबतचे संकेत दिले आहेत. ‘राज्यातील सर्व जिल्ह्यांचा स्थानिक आढावा घेतला जाणार आहे. त्यामध्ये ऑक्सिजन, बेड आणि व्हेंटिलेटरची परिस्थिती पाहून लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्टीकरणात्मक उत्तर पाटील यांनी दिले आहे.
तसेच, देशात १ मे पासून, तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेअंतर्गत, १८ वर्षांवरील सर्वांना सरसकट लसीकरण चालू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात देखील लसीकरण मोफत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले होते. पण सध्यातरी असा कुठलाही निर्णय झाला नाही. याबाबत महाविकासआघाडी एकत्र बैठकीत मोफत लसीकरणाबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यातील महामारीची परिस्थिती गंभीर बनली असून ऑक्सिजन, बेड, रेमेडिसीवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. वैद्यकीय यंत्रणेवर भारी ताण पडला असून अनेक ठिकाणी महामारीशी लढण्यासाठी केंद्र उभारयाला देखील नर्सिंग स्टाफ मिळत नाहीये. त्यामुळे राज्यात १ मे नंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.