काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांना काँग्रेस बाहेरचा रस्ता दाखवू शकते. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया आणि शिस्तभंगाच्या आरोप ठेवण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी हायकमांडकडे याबाबत रिपोर्ट सादर करुन संजय निरुपम यांची हकालपट्टी करण्याची शिफारस केली आहे.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणाले की, सचिन पायलट यांच्या प्रकारानंतर आता ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने पक्षविरोधी कारवाया आणि पक्षाची शिस्तभंग करणाऱ्या नेत्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ट्विट करणारे काही नेते एआयसीसीच्या रडारवर आहेत. तर संजय निरुपम यांनी माझं कोणतंही विधान अथवा ट्विट कोणत्याही प्रकारे पक्षविरोधी कारवायांचा भाग आहे असं मला वाटत नाही असं सांगितले आहे.
संजय निरुपम म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी बनवण्याची गरज नव्हती असं पहिल्या दिवसापासून माझं स्पष्ट मत आहे. आताही सरकारमध्ये काँग्रेसची कोणतीही भूमिका नाही, सर्व काम शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून करत आहे. मागील ६ महिन्यापासून मुंबईत काँग्रेस पक्षाचं अस्तित्व नाही, संपूर्ण पक्ष क्वारंटाईन झाला आहे असा आरोप त्यांनी केला. तसेच गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही निरुपम यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात मोर्चेबांधणी केली होती. ते म्हणाले होते की, कॉंग्रेसमध्ये दोन गट आहेत, त्यातील एक सोनिया गांधी आणि दुसरे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आहेत. सोनियाचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनाही त्यांनी लक्ष्य केले होते.