बिड, दि. ५ – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी बीडमध्ये विनायक मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी महा विकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ठाकरे सरकारच्या चुकीमुळेच मराठा आरक्षण रद्द झाल्याचा आरोप मेटे यांनी केले. काँग्रेसच्या मनात मराठा समजाबद्दल विष असून, अशोक चव्हाण यांचा जोपर्यंत राजीनामा घेणार नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाहीत, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच आज अनेक जण मराठा मोर्चात सामील झाले आहे. मात्र अनेक मराठे घराला कडी कुलूप लावून बसले असून अशांची लाज वाटते, असेही मेटे म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला दिले गेलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द केल्यानंतर बीडमध्ये राज्यातील पहिला मराठा मोर्चा काढण्यात आला आहे. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला आहे. मराठा क्रांती संघर्ष मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आली होती. तरीदेखील बीडमध्ये निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मराठा क्रांती संघर्ष मोर्चासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात होता. तरी सुद्धा विनायक मेटे यांनी मोर्चा काढला.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मोर्चे काढण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांचा विरोध दर्शवला आहे. कोरोनाच्या विळख्यात लोक सापडू नयेत त्यामुळे मोर्चे न काढता चर्चेतून मार्ग काढण्यास त्यांनी तयारी दर्शवली आहे. परंतू आता विनायक मेटे यांनी आंदोलनाचा नारा दिल्याने कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न आता उभा राहू शकतो.