मुंबई : हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. हाथरसच्या गावातील चार तरुणांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतर आरोपींनी तरुणीला मारहाण केली आणि तिची जीभ कापली. तिची गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्नही केला. यामध्ये तिला गंभीररित्या दुखापत झाली असून अलीगढच्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. तरुणीने तिच्यासोबत घडलेला प्रकार कोणालाही सांगून नये म्हणून तिची जीभ कापण्यात आली होती.
यावरून आता काँग्रेसने उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.भारतमातेच्या मुलीची बलात्कार करून हत्या, उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा असं काँग्रेसने म्हटलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे.
आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचं ट्विट केलं आहे. “भारतमातेच्या एका मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आली. दहा दिवसांनंतरही तक्रार दाखल केली नाही. तिला दिल्लीतील रुग्णालयात पोहोचवण्यास उशीर केला आणि पोलिसांनी मृतदेहावर जबरदस्तीने अंत्यसंस्कार केले. याला जंगलराज म्हणतात. उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
जंगलराज हटाओ। राष्ट्रपति शासन लाओ। https://t.co/qwEv2KQDKH
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 30, 2020