नागपूर : हे वचनभंग करणारे सरकार आहे. हे सरकार आहे की तमाशा सुरू आहे. कोणाचाच कोणाशी ताळमेळ नाही, असे म्हणत राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. नागपूर पदधीवर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून पूर्व विदर्भ पदवीधर मेळावा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी फडणवीस बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, जनतेशी विश्वासघात करून हे सरकार स्थापले आहे. एक वर्ष झाले तरी सरकारमधील एकही मंत्री त्यांची उपलब्धी सांगू शकला नाही. मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी धमकवल्याशिवाय काहीही केले नाही. हा एकवर्षाचा काळा कारभार आहे.
एक वर्ष झालं. यांनी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन 25 हजार, 50 हजार देण्याचे वचन दिले होते. मुख्यमंत्री पदाचे वचन लक्षात राहिले, न दिलेलं वचन देखील लक्षात राहते, पण शेतकऱ्यांना दिलेले वचन लक्षात राहत नाही, असा टोला देखील त्यांनी लगावला. हे वचनभंग करणारे सरकार आहे. हे सरकार आहे की तमाशा सुरू आहे. कोणाचाच कोणाशी ताळमेळ नाही, असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
हे तीन पक्ष एकत्र आल्याने नुकसान महाराष्ट्राचे होत आहे आणि फायदा मंत्र्यांचा होत आहे. रोज बदल्या करा आणि माल कमवा, एवढेच काम या सरकारमध्ये चालले असल्याची टीका फडणवीसांनी केली.