जळगांव : काल झालेल्या शरद पवारांच्या भेटीनंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर आहेत. जळगांवत पोहचताच शिवसैनिकांकडून त्यांचा ताफा अडवण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाने थैमान घातलं होतं. यात केळी बागांसह घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी शिवसैनिकांनी फडणवीसांचा ताफा अडवला.
परिवर्तन चौकात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ताफा अडवत शेतकऱ्यांच्या केळी पीक विमाबाबत जाब विचारला. एकनाथ खडसे अनेक वर्ष भाजपाचे आमदार असतानाही कोणती विकासकामं केली नसल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. फडणवीसांसोबत यावेळी गिरीश महाजनदेखील उपस्थित होते. गेल्या आठवड्यात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील मोदाळदे गावातील १८० घरं पडली आहेत. त्यामुळे सध्या गावातील नागरिक बेघर झाले आहेत. फडणवीसांना बेघर झालेल्या नागरिकांची भेट घेत शासनाकडून भरीव मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं.
फडणवीसांनी मुक्ताईनगरमधून आपल्या दौऱ्याला सुरुवात करताना सर्वांना आश्चर्याचा धक्का देत भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरी भेट दिली. एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे जळगाव दौऱ्यात फडणवीस एकनाथ खडसेंच्या घरी गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.