जळगाव : काही दिवसांपुर्वीच एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ आपल्या हाती बांधले होते. आता खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची निवड का केली, याचे कारण सांगितले आहे. बहुजन समाजाला खऱ्याअर्थाने न्याय देणारे शरद पवारच आहेत. म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो, असे एकनाथ खडसे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे प्रथमच जळगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात दाखल झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.
भाजप मी सोडलेला नाही तर पक्षाने मला बाहेर ढकलून दिले आहे. भाजपमध्ये असताना माझा खूप छळ झाला, किती अपमान झाला तरीही मला पक्ष सोडायचा नव्हता. परंतु त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली की शेवटी मला पक्ष सोडावा लागला, असे खडसे म्हणाले.
महाविकास आघाडीचे तीन पक्षाचे सरकार रिक्षा म्हणून भाजपचे नेते टीका करतात. मग, अटलजींनी तर एनडीएचा महाट्रक चालवला होता. त्यांनी अनेकांचे सरकार सांभाळले होते, असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
भाजप त्यांचे आमदार सांभाळण्यासाठी सरकार पडणार असल्याचे दावे करण्याचे उद्योग करत आहे. मी तिकडे असताना हे उद्योग केले आहेत, आमदार सांभाळण्यासाठी ते करावेच लागते, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.