महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी प्रचंड पैसा गोळा केल्याचा गंभीर आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.तसेच या प्रकरणाची सीबीआयडीकडून चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘ राज्य सरकारने कोरोनामुळे बदल्या रोखल्या होत्या पण नंतर पंधरा टक्के बदल्यांना परवानगी देऊन त्यावरील स्थगिती उठविली. परिणामी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी मलाईदार ठिकाणी बदली करून देण्याचा बाजार मांडला. यामध्ये फार मोठ्या रकमेची उलाढाल झाली. तसेच ज्यांचे राजकीय लागेबांधे नाहीत आणि ज्यांच्याकडे आर्थिक बळ नाही अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर यामध्ये अन्याय झाला आहे. या सर्व प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी करण्याची गरज आहे’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थ खात्याने बदल्या करू नयेत, असा आदेश दिलेला असतानाही बदल्यांवरील स्थगिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सामान्य प्रशासन विभागाने उठवली, हे आश्चर्यकारक असल्याचेहि पाटील यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारच्या अर्थ विभागाने ४ मे रोजी कोरोनाच्या महासाथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत एक शासन निर्णय घोषीत केला आणि त्याअंतर्गत अनेक निर्बंध लादले. यामध्ये चालू आर्थिक वर्षात कोणत्याही संवर्गातील अधिकारी अथवा कर्मचारी यांची बदली करू नये, याविषयीचा आदेश सामान्य प्रशासन विभागामार्फत देण्यात येईल, असे म्हटले होते. विविध विभागांनी कोरोनाच्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजनांमध्ये सातत्य राहणे आवश्यक असल्याचे कारण बदल्यांवर बंदी घालण्यामागे देण्यात आले होते.
दरम्यान, ७ जुलै रोजी सामान्य प्रशासन विभागाने अर्थ विभागाच्या ४ मे रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने आदेश काढला व पंधरा टक्के बदल्या ३१ जुलैपर्यंत कराव्यात असे स्पष्ट केले. तसेच त्यानंतर २३ जुलै रोजी आणखी एक आदेश काढून बदल्यांची मुदत १० ऑगस्ट केली. हा बदल्यांच्या धोरणातील विलंब आणि गोंधळ असल्याची टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.