कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना 14 दिवसांसाठी रत्नागिरीत क्वारंटाईन करावे, अशी मागणी माजी आमदार आणि भाजपचे नेते विनय नातू यांनी केली
रत्नागिरीच्या आरोग्य व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेणे अपेक्षित आहेत. मात्र, सध्या मंत्री मुंबईत जाऊन बसत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रत्नागिरीतील प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनिल परब यांना क्वारंटाईन करुन घ्यावे, अशी भूमिका विनय नातू यांनी मांडली.
“जिल्ह्यामध्ये एसटीबाबत अनेक विषय आणि त्यांचे निर्णय होणे गरजेचे आहे. गौरी-गणपती सणाकरता गणेशभक्त वेगवेगळ्या मार्गाने गावांमध्ये दाखल होत आहेत. त्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय योजना याबाबतही निर्णय होणे गरजेचे आहे. असे असताना जिल्ह्यातील मंत्री क्वारंटाईन होण्यासाठी मुंबईत जाऊन राहतात आणि आता पालकमंत्री देखील परत मुंबईला गेले, तर अनेक प्रश्न प्रलंबित राहतील. त्यामुळे ज्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेने बिहारचे पोलीस अधिकारी तिवारी यांना मुंबईतच क्वारंटाईन केले. त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्री अनिल परब यांना रत्नागिरी जिल्ह्यातच क्वारंटाईन करुन ठेवावे,” असं विनय नातू यांनी सांगितलं.