मुंबई –“मावळते वर्ष करोना संकटाशी लढण्यातच निघून गेले. येणारे नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य, समाधान घेऊन येवो. मावळत्या २०२० या वर्षाने आपल्याला जीवनाच्या बाबतीत खूप काही शिकवलं. आता नववर्षाच्या सुरुवातीलाच संपूर्ण जग करोनामुक्त होवो आणि साऱ्यांना मुक्तसंचाराचा आनंद घेण्याची संधी लवकर मिळो”, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नववर्षांच्या पूर्वसंध्येला राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.
“मावळत्या वर्षाने आपल्याला जीवन जगण्यासंदर्भात अनेक नवीन गोष्टी शिकवल्या. त्या गोष्टींपासून बोध घेऊन नववर्षाची सुरूवात करुया. करोनाचे संकट अद्याप कायम असल्याने मास्क लावणे, गर्दी टाळणे, हात वारंवार धूत राहणे या त्रिसूत्रीचे पालन करूया. करोनापासून स्वतःचे आणि कुटुंबाचे व समाजाचे संरक्षण करत दैनंदिन व्यवहार हळूहळू काळजीपूर्वक सुरु करूया”, असे विनंतीयुक्त आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
“येणारे नवीन वर्ष राज्यातील शेतकरी, कष्टकऱ्यांसह सर्व बांधवांना विकासाची संधी उपलब्ध करुन देणारे आणि राज्याला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर नेणारे ठरेल”, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.