जुन्नर : वाढत्या बिबट्याच्या हल्यांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, या भागातील नागरिकांचे जगणेही मुश्किल झाल्याने जुन्नरचे माजी आमदार शरद दादा सोनवणे यांनी पुकारलेल्या बेमुदत आमरण उपोषण स्थळी आज माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भेट देऊन या आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. यावेळी माझ्यासमवेत भाजपा नेत्या आशाताई बुचके यांनी देखील पाठिंबा व्यक्त केला.
जुन्नर व शिरूरसह आजूबाजूच्या तालुक्यात बिबट्यांचा मोठा वावर झाला आहे. एकाच महिन्यात पाच मनुष्यवध झाले आहे. जुन्नर तालुक्यातील लोकांना घरातून बाहेर पडताना जीव मुठीत धरून पडावे लागत असून लोक भयभीत झाले आहेत. बिबट्याच्या हल्यात मृत्युमुखी झालेल्या कुटुंबातील माझी महिला भगिनी ‘तुमची 25 लाखाची मदत परत घ्या, आमची मुलगी आम्हाला परत करा’ असा आज टाहो फोडत आहे. हे दृश्य पाहून अंतःकरण भरून येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, खरं पाहिलं तर भारतात सर्वाधिक बिबट्या असलेले हे क्षेत्र आहे. दुर्दैवाने सरकार कुठलंही असलं तरी या विषयाकडे आजवर दुर्लक्ष झाले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात जुन्नर परिक्षेत्रात १० वर्षात २२ मनुष्यवध झाले असून केवळ मागील सहा महिन्यातच ५ मनुष्यवध झाले आहे. यावरून हा विषय किती गंभीर आहे हे दिसून येते. प्रशासनाने याबाबत डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज होती.
वनाधिकाऱ्यांच्या गलथानपनाची चौकशी आज उद्या होईलच. मात्र मी उद्या मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांची समक्ष भेट घेऊन येथील जनतेच्या ज्वलंत मागण्या विशेष करून माजी आमदार शरददादा सोनवणे यांच्या आठ मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेतही माझी बैठक होणार असून त्यावेळीही मी याबाबतची आग्रही मागणी मांडणार आहे. वाढत्या बिबट्याच्या हल्ल्यांबाबत येथील लोकांना दिलासा मिळणारा ठोस निर्णय झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही, असे यावेळी सांगितले.