मुंबई: राज्यामध्ये सुरू असलेल्या सत्तानाट्यामध्ये आता टर्निंग पॉइंट आलेला आहे. गेल्या आठवडाभरापासून शिवसेना बंडखोरांशी आपला काहीही संबंध नसलेल्या भाजपने आता राज्यपालांना एक पत्र दिले आहे, या पत्रामध्ये शिवसेनेचे एकोणचाळीस आमदार हे बाहेर पडले असून सरकार अल्पमतात आले असल्याचं सांगण्यात आला आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत ही मागणी केली आहे. तसेच भाजपच्या सगळ्या आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या परिस्थितीमध्ये शिवसेनेचे 39 आमदार हे शिवसेने सोबत असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला समर्थन देऊ नये या मताचे आहेत, त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेले सरकार हे अल्पमतात आल्याचं दिसतय, त्यामुळे या सरकारला आपले बहुमत सादर करायला सांगावे, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली असल्याची माहिती फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे जवळपास 39 शिवसेना आमदारांसह बाहेर पडले आहेत. तसेच त्यांच्यासोबत 10 अपक्ष आमदार हे आसाममधील गुवाहाटीमध्ये आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढावा आणि भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी मागणी या आमदारांची आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडण्यास नकार देण्यात आला, त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यानंतर आता राज्यांमध्ये सत्तापालट होण्याच्या घडामोडी घडत आहेत. आत भाजपने राज्यपालांकडे केलेल्या मागणीनंतर भगतसिंह कोश्यारी महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. आघाडी बहुमतसिद्ध करू न शकल्यास सत्ता बदल होणार हे नक्की आहे.