बारामती : राज्यात सध्या असलेला करोना लसींचा तुटवडा, गेल्या दोन महिन्यांपासून आणि खासकरून गेल्या २ दिवसांत करोना बाधित रुग्णांची राज्यभरात वाढलेली संख्या, त्यामुळे आरोग्य सोयी-सुविधांचा उडालेला गोंधळ, त्यातून निर्माण झालेली भयंकर परिस्थिती, इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका अशा आरोग्य सुविधांची जाणवत असलेली कमतरता, अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
दरम्यान, आज बारामतीमध्ये या सर्व विषयांवर प्रसार माध्यमांशी बोलताना, अजित पवार यांनी, संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल. प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेवून चालणार नाही, असे स्पष्टीकरण दिले. तसेच, या बैठकीमध्ये सोमवारपासून दुकाने उघडू द्या अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. त्याबाबत देखील चर्चा होईल आणि आज रात्री किंवा उद्या निर्णय जाहीर केला जाईल, असे म्हटले आहे.
पुणे जिल्ह्यातही करोनाच्या होणाऱ्या रूग्णवाढीसंदर्भात बोलताना त्यांनी, ‘करोना बाधित रुग्णांची होणारी वाढ आपल्याला रोखायची आहे. त्यासाठी काही कठोर निर्बंध घालून दिले आहेत. त्याची अंमलबजावणी पोलिस यंत्रणेने करावी, अशा सुचना दिल्या आहेत. जिल्ह्यात याबद्दल कशा पद्धतीने उपाययोजना राबवायच्या याबद्दल आज पुण्यात बैठक आहे, असे सांगितले.