नाशिक : एकीकडे करोनाच्या विळख्यात महाराष्ट्र राज्य सापडले असताना, दुसरीकडे राज्यातील नाशिक शहरामधील डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन वायूची गळती झाल्यामुळे २२ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेबाबत देशभरातून संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही, या दुर्घटनेस जे कुणी जबाबदार असतील त्यांची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदतही त्यांनी जाहीर केली आहे.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही, ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत, दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत. संपूर्ण आरोग्य यंत्रणा रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी जोखीम पत्करुन कोरोनासंकटाशी लढत असताना अशी दुर्घटना घडणे अत्यंत दुर्देवी आहे, तसेच या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींना निश्चित शिक्षा केली जाईल, असे देखील त्यांनी सांगितले आहे.
यावेळी त्यांनी, यापुढे अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी घेतानाच, राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत सुरु राहील, याची दक्षता घेण्याची सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या असून, नाशिक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अन्य रुग्णांलयांमधील ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा तसेच रुग्णालयांच्या सुरक्षितता सुनिश्चित करण्यासंदर्भातील कार्यवाही तात्काळ केली जावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.