पुणे: पुणे येथे १९ जूनला झालेल्या कार्यक्रमातील प्रचंड गर्दीला स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलीय. पुण्यातील कार्यक्रमाच्या गर्दीत केवळ १५० नाही, तर सुमारे ५ हजार कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे फक्त दिडशे कार्यकर्त्यांवरच गुन्हा दाखल का करण्यात आला? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
प्रविण दरेकर म्हणाले, “विनायक मेटे यांच्या बीडच्या मराठा मोर्चामध्ये सहभागी ३ हजार कार्यकर्त्यांवर गर्दी जमा केल्याचा आरोप ठेवत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. बीडमध्ये विनायक मेटे यांना जो न्याय दिला तोच समान न्याय पुणे येथील कार्यक्रमाला लावला पाहिजे. मी आणि मंगल प्रभात लोढा यांनी सायन हॉस्पिटलच्या वैद्यकीय दुरावस्थेसंदर्भात आंदोलन केलं. त्यावेळी आमच्यावर गुन्हे दाखल झाले.”
रम्यान, पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालय उद्घाटन कार्यक्रमाची गर्दी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भोवण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह १०० ते १५० दिडशे कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही गर्दी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवणारी ठरु शकते. त्यामुळे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली होती. त्यानंतर आज जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजित पवार गर्दीवर नेमकं काय म्हणाले?
“गाडीत असताना उद्घाटन न करता निघून जावं असा विचार आला. मात्र कार्यकर्ते नाराज झाले असते. लोकांमध्येही नाराजी दिसली असती. मी प्रसादला सांगितलं होतं की अतिशय साधेपणाने, नियमांचं तंतोतंत पालन करुन आपण हा कार्यक्रम घेतला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही जनतेला आवाहन करतो की, आपण नियमांचं पालन करा आणि मलाच एका कार्यक्रमात बोलवलं जात आणि इतक्या अडचणीत टाकलं जातं की धड धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही. अशी माझी अवस्था झाली आहे. त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो”, असं अजित पवार म्हणाले.