पुणे – कोल्हापुरातील खानापूर गावात आघाडीत बिघाडी झाल्यामुळे येथील ग्रामपंचायत निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. हे गाव खुद्द चंद्रकांत पाटलांचे असल्यामुळे येथील निवडणुकीला विशेष महत्त्व आले आहे. स्थानिक पातळीवर का असेना, पण शिवसेनेविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी शड्डू ठोकत चक्क भाजपशी आघाडी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या आघाडीची राज्यात चर्चा होऊ लागल्यामुळे थेट वरिष्ठ नेत्यांनासुद्धा या खानापुरातील निवडणुकीची दखल घ्यावी लागली आहे.
या निवडणुकीबाबत अजित पवार यांना विचारले असता “ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावामध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. हे अतिशय चुकीचं आहे,” असे म्हणत कोल्हापुरातील खानापूर गावातील नव्या राजकीय समीकरणाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोध केला.
खानापुरात आघाडीत बिघाडी झाल्यानंतर अजित पवार यांनी स्थानिक नेत्यांना सूचना दिल्याचे सांगितले आहे. मात्र, सध्यातरी येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपशी युती केलेली असून येथे शिवसेना हा पक्ष एकटा पडल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे खानापुरातील स्थानिकांना सूचना दिल्यानंतर आता य़ेथे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.