औरंगाबाद : शहरातील अनेक खाजगी रुग्णालयांना महात्मा ज्योतीबा फुले जीवनदायी या आरोग्य योजनेत कोट्यावधी रुपये आले, पण प्रत्यक्ष रुग्णांना त्याचा लाभ मिळाला नाही, रुग्णालयांनी त्यांच्याकडून पैसे घेतले असा आरोप करत हर्षवर्धन जाधव यांनी हा खूप मोठा घोटाळा असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे जाधव यांच्या या आरोपानंतर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी देखील खडबडून जागे झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या विषयावर वादळी चर्चा झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने आजच्या आज या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कोरोनाच्या संकटात महात्मा ज्योतीबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ किती रुग्णांना मिळाला हा मुद्दा हाती घेऊन आरोगय यंत्रणेला चांगलाच हादरा दिला आहे. जाधव हे सध्या आपल्या शिवस्वराज बहुजन संघटनेच्या माध्यमातून सक्रीय झाले आहेत. पीक कर्ज, खत, युरिया, बियाणे याचा प्रश्न हाती घेतल्यानंतर त्यांनी आता आपला मोर्चा महात्मा ज्योतीबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेकडे वळवला आहे.
जिल्ह्यात रुग्णांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याची ओरड मोठ्या प्रमाणात सुरू असतांना शासनाकडून मात्र जानेवारी २०१८ ते आॅगस्ट २०२० दरम्यान तब्बल ४५९७३ रुग्णांना अडीचशे कोटी रुपयांचा लाभ देण्यात आल्याचे म्हटले आहे. हर्षवर्धन जाधव यांनी ही यादी सोशल मिडियावर व्हायरल करत त्यावरच प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे.
पिशोर या आपल्या गावातील एका व्यक्तीला खाजगी रुग्णालयाने १ लाख ३० हजारांचे बील आकारल्यानंतर जाधव यांनी संबंधित रुग्णालयाला जाब विचारत सदर रुग्णाला योजनेचा लाभ का दिला नाही ? त्याच्याकडून पैसे कसे काय घेतले ? असा सवाल करत संपुर्ण योजनेची माहिती मागितली होती.
शिवाय योजनेच्या वेबसाईटवरून जिल्ह्याला योजनेअंतर्गत किती पैसे आले आणि त्याचा प्रत्यक्षात लाभ किती रुग्णांना मिळाला याचीही माहिती मिळवली. अडीचशे कोटीहून अधिकचा निधी या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १६ हून अधिक खाजगी रुग्णालयांना देण्यात आला आहे. एक लाखाहून अधिक शस्त्रक्रिया आणि थेरपीच्या रुग्णांना या योजनेचा लाभ देण्यात आल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
परंतु जाधव यांनी या योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली. आज जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या बैठकीत हाच मुद्दा केंद्रस्थानी होता. शिवाय जाधव यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.