नागपूर : उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार संपूर्ण देशात नीट-जेईई परीक्षा होऊ घातल्या आहेत. कोरोनाचा लॉकडाऊन सुरू असल्यामुळे मुंबईच्या लोकल रेल्वेत केवळ अत्यावश्यक कामांसाठीच प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेसाठी आवागमन करू शकतील.
प्रवेशपत्रालाच रेल्वेचा पास समजून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधा पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना केली होती. त्यांनी तत्काळ ही मागणी पूर्ण केली. फडणवीस यांनी कालच आपल्या मागणीचे पत्र अमित शहा यांना ट्विट केले. त्यांच्या ट्विटला गृहमंत्र्यांनी तत्काळ प्रतिसाद दिला.
विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता, गृहमंत्री अमित शहा यांनी तत्काळ रेल्वे मंत्रालयाला तशा सूचना दिल्या. त्यामुळे नीट-जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आपली विद्यार्थहिताची मागणी तत्काळ पूर्ण केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहे आणि योग्य वेळी योग्य सूविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यार्थांनी फडणवीसांचे आभार मानले आहे.
देशभरात नीट-जेईई परीक्षा लवकरच घेण्यात येणार असून मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरी सेवांमध्ये योग्य ती वाढ केली करावी आणि संभाव्य उमेदवारांना या परीक्षेला बसण्यासाठी प्रवेशपत्रांच्या आधारे प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी. त्यानुसार 1 सप्टेंबर 2020 पासून मुंबई आणि मुंबई उपनगरी सेवा योग्यरित्या वाढविण्यासाठी मध्यवर्ती व पश्चिम रेल्वेने कार्यवाही करावी, अशा सूचना केंद्रातून देण्यात आल्या आहेत.