पुणे : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी, पक्षांमधील नेत्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाकयुद्ध रंगत असते. मागील काही दिवसांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये द्वंद सुरू आहे. अमोल कोल्हे मतदारसंघातून गायब झाले असून, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.
कोरोना संकटाच्या काळात अमोल कोल्हे मतदारसंघाकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका केली जात आहे. मागील काही दिवसांपासून डॉ. अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे.
आज शिरूरचा दौरा करताना अमोल कोल्हेंना मतदारसंघातून गायब झाल्याच्या टीकेबाबत प्रश्न विचारले असता, त्यांनी तुम्हीच सांगा माझे मतदारसंघाकडे लक्ष आहे की दुर्लक्ष ?
अमोल कोल्हेंनी मलठण येथील कोव्हिड सेंटरला भेट दिली. यावेळी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, शिरूर लोकसभा मतदार संघातील सर्व समस्या माझ्या तोंडपाठ आहेत. कोरोनाशी संबंधित विकास कामे याबाबतची माहिती आकडेवारीसह दिली आहे. त्यामुळे तुम्हीच सांगा माझे मतदारसंघाकडे लक्ष आहे की दुर्लक्ष ? बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह याची भेट घेतल्याचे देखील त्यांनी सांगितले.