पुणे : अमोल कोल्हे हे मतदारसंघातून गायब झाले आहेत, कोरोना महामारीच्या काळात त्यांचे मतदारसंघाकडे लक्ष नाही, अशी टीका सातत्याने शिवसेनेकडून कोल्हे यांच्यावर केली जात आहे. अमोल कोल्हे हे मतदारसंघात भेटत नसल्याची टीका शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडून केली जात आहे. दोन्ही नेत्यांमधील न्यूज वॉर देखील काही दिवसांपुर्वी चर्चेत होते. आता आपल्यावरील टीकेला अमोल कोल्हे यांनी उत्तर दिले आहे.
माझ्यावर कुणी आरोप करत असलं तर त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे. आपल्या पहिल्या टर्ममध्ये आपण संसदेत किती वेळा बोललो होतो हे आठवावे, असे म्हणत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना टोला लगावला आहे.
कालचा पोरगा संसदेत निवडून आला, तो एका वर्षात बारा वेळा बोलतो आणि तीन टर्म खासदार राहिलेला पहिल्या टर्ममध्ये 8 वेळा बोलत असेल तर हा संशोधनाचा विषय आहे, असा सणसणीत टोला देखील कोल्हेंनी लगावला. शिरुरच्या जनतेसाठी मागील एक वर्षात चांगले काम करायला मिळाले याचा मनोमन आनंद आहे, असेही कोल्हे म्हणाले.