मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे घर आणि इतर मालमत्तांवर सीबीआयने छापा टाकला आहे. मुंबईसह दहा ठिकाणी सीबीआयने धाड टाकली आहे. 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणी ही कारवाई केल्याचं समजले आहे. दरम्यान अनिल देशमुख सध्या नागपूरमध्ये आहेत. या छापेमारी संदर्भातील प्रकरणांमध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, अनिल देशमुख आत्ता सीबीआयच्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत दुसरा नंबर हा मंत्री अनिल परब यांचा आहे. या प्रकरणांमध्ये सध्या सीबीआय, ईडी अशा विविध संस्थांचा सहभाग आहे. यात दोन हजार कोटींचा घोटाळा झालेला आहे. आता इन्कम टॅक्स फ्रॉड सुद्धा ह्या माध्यमातून जनतेच्या समोर येईल असे ते म्हणाले.
सीबीआयच्या छापेमारीनंतर आता महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्री हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत आणि प्रसार माध्यमांमध्ये ते देशमुखांची बाजू मांडत आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी अनिल देशमुखांच्या बाजूने वक्तव्ये केली आहेत. त्याच प्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात वर्षा बंगल्यावर अत्यंत महत्वाची बैठक या संदर्भात पार पडली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी सीबीआयने सुरुवातीला अनिल देशमुख यांची चौकशी केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि आता देशमुख यांच्या घरासह त्यांच्या मालमत्तांवर छापा टाकला आहे. ११ एप्रिल रोजी सीबीआयने देशमुख यांच्या दोन वैयक्तिक सहाय्यकांची चौकशी केली होती. एजन्सीने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग, सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील, निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे आणि पोलिस उपायुक्त यांचेही जबाब नोंदवले होते. मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट्समधून दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याचे काही पोलिस अधिकाऱ्यांना सांगण्यात आले, असा आरोप देशमुख यांच्यावर केला जात होता. उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांनी या पदाचा राजीनामा दिला होता.