महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगावातील मनगुत्ती गावातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आल्यानंतर मनगुत्तीपासून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. कर्नाटकात भाजप सरकार असल्यामुळे शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
“शिवाजी महाराजांचा पुतळा हटविणारे बोलावते धनी कोण आहेत? तर निश्चितपणे जगाने बघितलं, तिथे भाजप सरकार आहे. त्यांच्या इशाऱ्यावर हे चाललेलं आहे. भाजपचे लोक त्या भागात सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अशा पद्धतीने अपमान करु लागले आहेत”, असा घणाघात शिवसेना नेते आणि राज्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केला आहे
“माझी भाजपच्या सर्व वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे की, तुमचं वर्तन आणि वागणूक बदला. ते बदललं नाही तर त्याचे दुष्परिणाम किंवा गंभीर परिणाम तुमच्या पक्षाला भोगावे लागतील”, असा इशारा अर्जुन खोतकर यांनी दिला.
“देशातील तरुण, शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. लोक कायदा हातात घ्यायला मागेपुढे बघणार नाहीत. वर्तन बदला नाहीतर परिणामाला सामोरे जा”, असादेखील इशारा अर्जुन खोतकर यांनी भाजपला दिला