मुंबई – राज्यातील दोन दिवसाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाला सुरुवात होताच विरोधकांनी गदारोळ घातला. कामकाज सुरु होण्यापूर्वीच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
कामकाजाला सुरुवात होण्याआधीच भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार उभे राहिले आणि कामकाजाची नियमावली ठरवण्याची आवश्यकता आहे असं सांगत संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, “आपण महाराष्ट्र विधानसभेच्या १८० पानांचं नियमांचं पुस्तक दिलं. ३२० नियम त्यामध्ये आहेत. अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. करोना, करोनाचा बाप, करोनाचा आजोबाही विचार केला तरी सभागृहात घुसू शकणार नाही. एवढी उत्तम व्यवस्था केली त्याबद्दल अभिनंदन, पण याची नियमावली ठरवणार आहात की नाही. कामकाजाची नियमावली ठरवण्याची आवश्यकता आहे”.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी बोलण्याचा प्रयत्न केला असता विरोधकांचा गोंधळ सुरुच होता. यावेळी ते म्हणाले की, “अनेक प्रश्न आहेत..दोन दिवसांचं अधिवेशन लोकशाहीला परवडणारं नाही. आमदारांचे अधिकार आणि त्यांचे प्रश्न सभागृहातच मांडू शकतो. सरकार आणि विरोधकांनी एकत्र बसून एक नियमावली तयार करता येईल. इतर राज्यांप्रमाणे आठ ते दहा दिवसांचं अधिवेशन घेतलं जाऊ शकतं. पुढील अधिवेशन नियमित होईल अशी कारावई केली पाहिजे”.