बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी वेळ पडल्यास विरोधीपक्षाच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करू, असे म्हटले होते. आता भाजप नेते आशिष शेला यांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिले असून, शिवसेनेने आंदोलन जरुर करावं, काँग्रेसच्या विरोधात करणार की नाही, याचं उत्तर द्यावे, असा टोला लगावला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कर्नाटकातील मनगुत्ती येथे रातोरात हटवल्याच्या घटनेचा आम्ही जाहीर निषेधच करतो! छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सन्मानाने बसविलाच पाहिजे!
पुतळा हटविण्यास जबाबदार असणाऱ्या काँग्रेसच्या स्थानिक आमदारांच्या विरोधात शिवसेना आंदोलन करणार का? pic.twitter.com/aaXjePCGKV— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 9, 2020
आशिष शेलार ट्विट करत म्हणाले की, कर्नाटकातील मनगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवला, याचा आम्ही निषेधच करतो. या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान या देशामध्ये, अखंड हिंदुस्तानामध्ये कधीही कोणी करता कामा नये, तो आम्ही होऊही देणार नाही. या सगळ्या मागे स्थानिक कॉंग्रेसचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी घेतलेली भूमिका ही थेट आहे, पुतळा हटवण्याची आहे. कॉंग्रेसचे प्रभारी अध्यक्ष असलेल्या जारकीहोळी यांच्याविरोधात संजय राऊत तुम्ही आणि शिवसेना आंदोलन करणार का? हा सवाल आमचा तुम्हाला आहे.
छत्रपतींसाठी आंदोलन करावे लागले, तर परवानगीची गरज काय? शिवसेनेला विरोधीपक्ष नेता आणि भाजपच्या परवानगीची गरजच का लागते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा त्याच ठिकाणी आणि सन्मानाने लावावा, असेही ते म्हणाले.