मुंबई – भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मुंबई महापालिका कोरोनावर 6 महिन्यात 1600 कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगतेय. पालिकेने अजून 400 कोटी हवेत असे म्हणतेय पण झालेल्या खर्चाचा हिशोब का देत नाही?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.
आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही निशाणा साधला. मुंबई महापालिकेच्या 1600 कोटीच्या मंजुरीनंतर 400 कोटींचा प्रस्ताव आल्यानं भाजपनं हिशोब देण्याची मागणी केली, असं आशिष शेलार म्हणाले.
मुंबई महापालिकेने 1600 कोटींचा हिशोब पारदर्शकपणे द्यावा, अशी मागणी आशिष शेलारांनी केली. मुंबईचा एक एक माणसाचा जीव वाचला पाहिजे ही सत्य परिस्थिती आहे. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाच्या वेळी झालेल्या खर्चाचा हिशोब मुंबई पालिका का देत नाही, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मुलाला वरळीच्या कोविड सेंटरमध्ये काम आणि जावयाला सॅनिटायझर पुरवण्याचं काम देण्यात आले, त्यांना किती मिळाले? सँनिटायझर पुरवणाऱ्या बोगस कंपन्यांच्या घशात किती घातले? पर्यावरण प्रेमी वरळीला किती गेले?, अशा प्रश्नांची सरबत्ती आशिष शेलार यांनी केली आहे. महापालिका वरळीला विशेष निधी देते, त्यामुळं वरळीला वेगळा न्याय का आणि इतर भागाला वेगळा न्याय का? महापौरांच्या मुलाला आणि जावयाला वेगळा न्याय आणि मुंबईकरांना वेगळा न्याय का?,असही आशिष शेलार म्हणाले.