सांगली – रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आजपासून किसान आत्मनिर्भर यात्रेस सुरुवात केली आहे. आशिष शेलार यांच्या हस्ते यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत भाजप नेते आशिष शेलार यांनी केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याला कडाडून विरोध करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
राजू शेट्टींना विधानपरिषदेसाठी दलालांचे तुणतुणे वाजवण्याची वेळ आली आहे, अशी घणाघाती टीका आशिष शेलार यांनी केली आहे. त्यामुळे येत्या काळात शेलार विरुद्ध शेट्टी अशी शाब्दिक चकमक झडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काही वर्षांपूर्वी एक सिनेमा आला होता. त्यात एक शिक्षक मोहापायी वाहवत जातो. शेवटी त्याला हाती तुणतुणे हाती धरण्याची वेळ येते. आताही तेच चित्रं दिसत आहे. शेतकऱ्यांचे नेते म्हणवणाऱ्या एका नेत्याला एका विधानपरिषदेसाटी हाती तुणतुणे धरण्याची वेळ आली आहे. फडावर जसं तुणतुणं हाती घ्यावी लागतं तसंच एक दलाला विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीची बाजू घेऊन तुणतुणे वाजवत आहे, अशी टीका शेलार यांनी केली.
नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचं कोणतंही नुकसान होणार नाही. अंबांनी आणि अदानीमुळे तर शेतकऱ्यांच्या हक्कांना कोणत्याही प्रकारचा धक्का लागणार नाही. अंबानी, अदानींनी शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लावला तर त्यांच्यासाठी मी मुंबईत काठी घेऊन बसलो आहेच, असंही त्यांनी सांगितलं.